कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेत राज्य सरकारने राज्यात कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे.तर दुसरीकडे जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. लसीकरणच्या तिसऱ्या टप्प्यात सध्या ४५ आणि त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना करोना लस देण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्रकारांसाठी विनंती केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पत्रकारांना लस देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले आहेत की, “आज आपल्या एका पत्रकार मित्राचे करोनामुळे निधन झाले. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी ही विनंती”.
या ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक पाठिंबा दिली असल्याचेही दुसरे ट्विट त्यांनी केली आहे. "पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे."